औरंगाबाद - पानी फाउंडेशनतर्फे आता डिजीटल माध्यामातून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने यंदा महाराष्ट्रभरातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण होणे शक्य नव्हते.
याआधी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी तुम्ही गावकरी प्रशिक्षणासाठी केंद्रावर यायचे. मात्र आता समृद्ध गाव स्पर्धेच्या नव्या पर्वात प्रशिक्षणच थेट तुमच्या घरांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अवलंबत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली.
१५ ते १७ जून २०२० यादरम्यान महाराष्ट्रभरातील समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ४० तालुक्यांमध्ये 'झाडे पृथ्वीला वाचवू शकतात' हे प्रशिक्षण कृषी अधिकारी डी. एल. मोहिते यांनी घेतले. पावसाळ्याच्या सुरूवातीला वृक्षारोपण कसे करावे याची शास्त्रीय माहिती देणाऱ्या या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहींनी आपल्या घरातच मोबाईलवर हे प्रशिक्षण पाहिले तर कारंजा तालुक्यातील दोनद बु आणि खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव सारख्या अनेकांनी social Distance चे पालन करत Laptop वर प्रशिक्षण घेतले.
जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने अनेकांनी वृक्षारोपणाची तयारी केली होती. त्यामुळे पानी फाउंडेशनतर्फे घेतल्या गेलेल्या वृक्षारोपणाविषयीच्या प्रशिक्षणाचा फायदा अनेकांना झाला.

Comments
Post a Comment